अमरावती : देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली. अमरावतीतील बडे नेते बच्चू कडू यांच्या नवे चिठ्ठी लिहून एका संत्रा उत्पादक शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अशोक पांडुरंग भुयार (अंजनगाव सूर्जी ता.धनेगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर (दोघेही रा.अंजनगाव सुर्जी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला..
बच्चू कडूंना न्याय देण्याची मागणी
व्यापाऱ्याने संत्र्याचे पैसे न दिल्याने आणि पोलिसांनीही सहकार्य न केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी केला होता. व्यापारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा दावाही त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. बच्चू कडू यांच्याकडे भुयार यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी चिठ्ठीतून केली होती.
भुयार यांच्या आत्महत्येनंतर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याला गावकऱ्यांनी घेराव घातला होता. ठाणेदार आणि बीट जमादारावर कारवाई करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्यासह संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत