नवी दिल्ली : भारतात कोरोना वॅक्सीनची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारकडून आजपासून (२ जानेवारी) देशातील प्रत्येक राज्यात कोरोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशभरात हा ‘ड्राय रन’ होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रांवर ‘ड्राय रन’ होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ड्राय रन’साठी संपूर्ण तयारी झालेली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली गेली आहे.