ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बँका, वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये,जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

सोलापूर,दि.13: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. बँकांनी, वित्तीय संस्थांनी, बचत गटांनी वसुलीसाठी तगादा लावणे, बळाचा वापर करणे, धमकावणे असे प्रकार करून कर्जवसुली करू नये, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

           श्री. शंभरकर यांनी आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या कालावधीत शेती, छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यवसाय, दळणवळण, व्यवहार बंद होते. अद्यापही अनेक व्यवसाय बंद आहेत. या काळातील मंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले, शेतकरी आर्थिक संकटात आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकार, रिझर्व बँकेने कर्जाच्या हप्ते वसुलीला सूट दिली होती. मात्र काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट कर्जदारांना तगादा लावून वसुली करीत आहेत. यावर निर्बंध आणण्यासाठी अग्रणी बँकेने जिल्ह्यातील राष्ट्रीय, वाणिज्य, सहकारी बँका, वित्तीय संस्था यांच्या वरिष्ठांची बैठक घेऊन सक्त सूचना कराव्यात. कर्जदारांना मानसिक आणि शारिरीक छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात,असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!