पुणे: मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास हे राज्य सरकार जबाबदार असेल, असा हल्लाबोल आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता २५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यात काहीतरी गडबड होऊ शकते असा संशय संभाजीराजे यांनी व्यक्त केला. ‘सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचं मी आतापर्यंत म्हणत होतो. पण आता मला गडबड वाटत आहे.
२५ जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं दिसत आहे. म्हणूनच हा ईडब्ल्यूएसचा मुद्दा रेटला जात आहे का?’, असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. २५ जानेवारीच्या सुनावणीत गडबड झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा पवित्रा त्यांनी घेतला.