अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा आणि बोरी नदीच्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे पण शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
जेऊर (ता.अक्कलकोट) येथील काशिलिंग देवस्थान ट्रस्टच्यावतीने हालहळ्ळी(मै) येथील पुरामुळे उद्धवस्त झालेल्या लोकांना अन्नधान्याचे वाटप म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी
ते बोलत होते. तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री दत्तात्रय भरणे या दोघांचे दौरे झाले आहेत. त्यांना सत्य परिस्थिती दाखविण्यात आली आहे.लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल.त्यादृष्टीने आपणही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असेही म्हेत्रे यावेळी म्हणाले.याप्रसंगी जि.प माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील ,जेष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव,नगरपरिषद विरोधीपक्ष नेते अश्पाक बळोरगी,बाबासाहेब पाटील,शिवराज स्वामी, मंगल पाटील आदी उपस्थित होते.