शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणाऱ्या ‘त्या’सेलिब्रिटींची चौकशी केली जाणार ; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती
मुंबई । शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानानं ट्विट केल्यानंतर देशात राजकारण रंगलं आहे. रिहानाच्या ट्विटनंतर एकाच वेळी भारतातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना समर्थन पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यावर सरकाराने याला विदेशी दुष्प्रचार म्हणत निंदा केली. यानंतर काही भारतीय सेलिब्रिटींनी सुरात सूर मिसळत ट्विट केले होते. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण, विराट कोहली, सायना नेहवाल यांचा समावेश होता.
दरम्यान, सुनील शेट्टीने ट्विट करताना मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केलं होतं. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता. सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचं गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे.