ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंदुत्व सोडन म्हणजे धोतर नाही?; मुख्यमंत्र्यांचा भाजपसह राज्यपालांवर पलटवार

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे.  ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. दरम्यान, यामध्ये मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपला व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं.

आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व सोयीचं नाही. आमचं हिंदुत्व आमच्या धमन्यांमध्ये भिनलेलं आहे. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का?, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला काढला.

राज्यात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू करताना मंदिरं उघडण्याची मागणी भाजपनं लावून धरली होती. त्यासाठी राज्यात आंदोलनंही करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं होतं. हिंदुत्व सोडून ‘सेक्युलर’ झालात का, असा प्रश्नही राज्यपालांनी केला होता. ‘सामना’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं.

मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय… मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतंय… राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही, असं सांगतानाच मग हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे काय? त्याने कोरोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका… आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. पहिलं या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व… आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, असा इशारा त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!