मुंबई – राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडी सरकार हे आपडो नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले असल्याचे म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले. त्यांनी एकामागून अनेक ट्विट करत आपली भूमिका मांडली.
उपाध्ये म्हणाले, “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर थपडा मिळत आहेत. तसेच जनतेला राज्यातील आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे”.
हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार
न्यायालयाकडून सरकारमधील मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर मिळत असलेल्या थपडा आणि जनतेला राज्यातील सरकारांकडून मिळत असलेल्या थापा पहाता हे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे. -१
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 8, 2021
न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ती मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती वाढतच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशी ठरविण्याचा काल आलेला निर्णय ताजा आहे.
एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात वारेमाप सवलत देण्याच्या थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकऱी धार्जिण्या करू, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा अनेक थापा सरकार जनतेला देत असून याची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच झाली आहे, अशा तिखट शब्दांत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली.