मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेली ईडीची कारवाई ही मोदी सरकारच्या आदेशाने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा व्यवहार काही वर्षांपूर्वीच झाला असल्याने, त्या मालमत्तेचा संबंध या कारवाईशी ईडीने कसा जोडला? असा प्रश्नही सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ईडीने केलेल्या कारवाईच्या मागे मोदी सरकार असल्याचा आरोप केला आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींचे आरोप लावणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अजून चौकशी का झाली नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 16 जुलै रोजी ईडीने कारवाई केली. त्यांचे वरळी येथील फ्लॅट आणि रायगड जिल्ह्यातील उरण इथे असलेली जमीन अशी एकूण 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने उत्तरे द्यावीत-
1. अजूनही ₹ 300 कोटींच्या मीडियातील वावड्यांची पुष्टी करता का? कारण आता आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ २.६७ कोटी किंमतीची आहे?
२. फ्लॅटची किंमत २००४ मध्ये दिली गेली तर तो या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो? pic.twitter.com/l4r6IwUaa4— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 17, 2021