ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जो समाजातील ऐक्याला तडा लावतो, जातीय धर्मात अंतर वाढवतो, तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही.

मुंबई दि. ५ जुलै – शिवसेनेचे हिंदूत्व आहे ते लपवून ठेवत नाही ते हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदूत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसामध्ये वितंडवाद वाढवणार… विद्वेष वाढवणारं आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केला.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मोठ्या गर्दीत पार पडली. यावेळी शरद पवार यांनी येणाऱ्या संकटाना सामोरे जाताना ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ अशी हाक दिली.

मधल्या काळात शाहूंच्या कोल्हापूरात, अकोला, नांदेड याठिकाणी दंगली झाल्या. या दंगलीत कोण होतं हे सर्वांना माहित आहे. जाणीवपूर्वक या दंगली केल्या. जिथे आपली सत्ता नाही त्याठिकाणी समाजासमाजात विद्वेष वाढवायचा आणि त्याचा राजकीय फायदा घेता येईल का यासंबंधी भूमिका घेतली गेली असा आरोपही शरद पवार यांनी केला.

जो समाजातील ऐक्याला तडा लावतो. जातीय धर्मात अंतर वाढवतो तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही. आज जे राष्ट्रप्रेमी नाहीयेत त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीत महागाईचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे.महाराष्ट्रात सहा महिन्याच्या कालावधीत चार हजारपेक्षा महिला बेपत्ता झाल्या. मुली सुरक्षित नाही. त्यांना राज्य चालवण्याचा अधिकार नाही असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे. त्यांनी आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे या लोकांवर भरवसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करणं हा एककलमी कार्यक्रम करायचा आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

आज चर्चा आहे कुणासोबत किती आमदार आहेत याची. आमदार आणता येतात. गेले त्यांची चिंता करू नका ते सुखाने राहू देत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सामुहिक शक्तीतून नक्की नव्याने कर्तृत्ववान अशा लोकांची पिढी, नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करु असा आत्मविश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

आजची बैठक ऐतिहासिक आहे संबंध देशाचे लक्ष लागले आहे तशी चर्चाही या बैठकीची सुरू आहे. २४ वर्षापूर्वी मुंबईत तुमच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जन्म झाला. शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली. २४ वर्षे झाली यामध्ये आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादीला यश आले. अनेक कार्यकर्ते आमदार, मंत्री, खासदार झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य कसं चालवू शकतो हे राष्ट्रवादीमुळे देशाला समजले. अनेक नवीन नेते तयार केले. मनात एकच भावना होती की, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घेतली त्यामध्ये तुमच्या कष्टाने आपण त्यामध्ये यशस्वी झालो. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत.ती संकट ज्याची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामधे देशाची सूत्रे आहेत. ज्यांच्या हातामध्ये सुत्रे आहेत त्यांच्यापुढे त्यांच्या सहकाऱ्यांनासुध्दा त्यांना म्हणावी तशी कल्पना मांडण्यासंदर्भात मर्यादा आहेत असेही शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारमध्ये मी काम केले आहे मनमोहन सिंग यांच्याबरोबर काम केले. विरोधी पक्षनेता म्हणून दिल्लीत काम केले. या सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितली आहे. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्यासंबंधी सुसंवाद साधणे त्यातून मार्ग काढणे हे सुत्र या देशात अनेक वर्षापासून चालू होते. आज चित्र बदलले आहे लोकशाहीमध्ये सरकार व जनता यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. मी चारवेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझी पध्दत होती आपण महत्वाचा निर्णय घेतलातर त्या निर्णयासंबधी सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो लोकांशी बोलावे लागते लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. जे अयोग्य असेल ते दुरुस्त केले पाहिजे आज तो संवाद देशात नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही.लोकांमध्ये आहोत. कधीकाळी सामान्य माणसाची दु:ख आणि त्यांची स्थिती समजते त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते पण संवाद राज्यकर्त्यांचा नसेल तर चित्र वेगळे दिसते. आज सर्व राज्यात एकप्रकारे अस्वस्थता आहे. आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले लोकशाहीला टिकवायची असेल, संसदीय पध्दतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात नाही त्यांच्याशी साधला. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. पंतप्रधानांनी तर राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याअगोदर बारामतीच्या सभेत प्रशासन कसे चालवायचे हे पवारसाहेबांचे बोट धरुन शिकलो. नंतर निवडणूकीत आले तेव्हा प्रचंड टिका केली. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनी संयमी बोलण्याची काळजी घेतली पाहिजे. नुसते आरोप करुन चालणार नाही. जर कुणी चुकीचे काम केले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सत्य सांगितले पाहिजे. पण त्यांनी ती धमक दाखवली नाही. देशाचे नेते आहोत, राष्ट्रीय पक्षाचे आहातच परंतु जनसामान्यांच्यासमोर बोलतो त्यावेळी त्याप्रकारची सभ्यता आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत त्या पाळल्या जात नाहीत अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का बरोबर घेतले. तुमच्या मंत्रीमंडळात कसे काय? याचा अर्थ असा आहे आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. जनमाणसामध्ये एकप्रकारे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज विधिमंडळाचे सदस्य, सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, खाजगीत सांगतात असेही शरद पवार म्हणाले.

आज काही लोकांनी बाजुला जाण्याची भूमिका घेतली माझी काही तक्रार नाही मला त्याचे दु:ख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाम गाळून विधीमंडळात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांना चांगले दिवस आणले. त्यांना विश्वासात न घेता पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली हे योग्य नाही. चुकीच्या विचारांच्या बाजूला जाऊन बसण्याची वेळ आली हे चांगले नाही असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

नाशिकला पक्षाच्या कार्यालयात ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगा आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस असे कसे म्हणता येईल. उद्या कुणीही उठेल मी राष्ट्रवादीचा आहे सांगेल, मी शिवसेना आहे सांगेल, मी भाजप आहे सांगेल, याला काही अर्थ आहे का? त्यामुळे अशाप्रकारची भूमिका मांडून ताबा घेणे योग्य नाही.हे लोकशाही मध्ये योग्य आहे का? असा सवाल करतानाच यासाठी शरद पवार यांनी कॉंग्रेसमध्ये असताना टिळकभवन आमच्याकडे होते नवीन पक्ष काढायचा निर्णय घेतला त्यानंतर ते कार्यालय सोडून देण्याचा निर्णय घेतला ती प्रॉपर्टी कॉंग्रेस पक्षाची होती. आम्ही ती हिसकावून घेतली नाही ही आठवण सांगितली. काल नाशिकमध्ये पक्षाची प्रॉपर्टी काही लोक पोलिसांची मदत घेऊन घेत आहेत. हा पक्ष आमचा आहे घड्याळ आमचे, त्यावरील चिन्ह आमचे आहे. ठिक आहे. तुम्ही म्हणू शकता निवडणूक आयोगाने घड्याळाचे चिन्ह कुणाला दिले हे देशाला माहित आहे. तुमच्यासाठी सांगतो कोण कुठे जाणार नाही. हे चिन्ह देशाचे राजकारण ठरवते माझ्या व्यक्तीगत जीवनात अनेक निवडणूका लढलो आहे. १९६७ साली पहिली निवडणूक केली माझे चिन्ह बैलजोडी होती. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये दोन भाग झाले. बैलजोडी गेली गायवासरु चिन्ह आले. त्यानंतर चरखा नंतर हात आला मग घड्याळ आले. मी हात, चरखा, गायवासरु, बैलजोडी या चिन्हावर लढलो त्यामुळे कोण सांगत असतील चिन्ह आम्ही घेऊन जाऊ पण एक सांगतो चिन्ह जाणार नाही आणि मी ते जाऊ देणार नाही असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

चिन्ह घेऊन जाणार असाल तर कुठलंही चिन्ह असेल. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका खोल आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वासही शरद पवार यांनी दिला.

आज माझ्यावर काही लोक बोलले. त्यांनी बोलताना मी त्यांचा गुरु आहे. आज मुंबईभर माझे फोटो लावले आहे. त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही जे नाणं घ्यायचे ते नाणं चालणारं पाहिजे कारण त्यांचे नाणं खरं नाहीय ते खणकन वाजणार नाही. हे लोक ओळखतील त्यामुळे नको ती अडचण म्हणून फोटो लावत आहेत असेही शरद पवार म्हणाले.

आज अनेकांनी भाषणे केली. राज्यात पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं कुणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपूरला जावं लागतं असं नाही कानाकोपऱ्यातील लोक वारीमध्ये जातात त्यांच्या अंतःकरणात एकच भावना असते पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे, पंढरीला पोचल्यानंतर मंदिरातसुध्दा जाता येत नाही बाहेरुन नवस करतात आणि आनंदाने परत जातात. त्यामुळे ती अवस्था आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, गुरु मानायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं…ही गमतीशीर गोष्ट आहे असेही शरद पवार म्हणाले.

छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना कसे मंत्री केले याची माहितीही शरद पवार यांनी यावेळी दिली.

राज्यकर्ते असे असले पाहिजे की, राज्य तरी एकत्र ठेवायचे… आज राज्याचे एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. त्यांनी अनेक वेळा भाषणे केली हे राज्य तोडले पाहिजे, वेगळा विदर्भ केला पाहिजे. वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही तसं करणार नाही असे बोलत होते पण आज काय झालं विदर्भाच्या प्रश्नामध्ये हे लोक किती लक्ष घालतात याची खात्री देता येत नाही. दिलेला शब्द कुणी पाळला नाही. आणि कारण नसताना आज राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावण्याची भाषा या लोकांनी कधीकाळी केली आहे. कसे राज्य चालेल आज आपले सहकारी गेले. दहा दिवसांपूर्वी त्यांचे भाषण आपण ऐकले. महाराष्ट्राच्या इतिहासात असला मुख्यमंत्री पाहिला नाही हे भाषण आहे त्यांचे आता असल्या मुख्यमंत्र्यांबरोबर नमस्कार म्हणून काम करायचे आहे.कुणाबरोबर काम करतोय आपण… असे सांगितले गेले की, शरद पवारांनीसुध्दा पुलोद सरकार बनवलं होतं. हो बनवलं होतं. आणीबाणीच्यानंतर हा निकाल सर्वांनी घेतला. कॉंग्रेस नेत्यांनी व सगळ्यांनी घेतला व सर्वांनी मला सांगितले की नेतृत्व तुम्ही करा पण त्याठिकाणी जो पक्ष होता तो भाजप नव्हता तर तो जनता पक्ष होता. जयप्रकाश नारायण यांच्या विचारातून एक अनेक पक्ष जन्माला आले बाकीचे सर्व पक्ष विसर्जित केले त्यानंतर एक पक्ष केला तो भाजप नव्हता तर जनता पक्ष होता त्यांच्या मदतीने हे देशपातळीवर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ७५ टक्के राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष केलेला आहे याची आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

असे सांगण्यात आले आम्ही भाजपसोबत गेलो चुकलं काय? नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली. खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले. एक गोष्ट लक्षात ठेवा नागालँड असेल मणीपूर तो संबंध भाग एक प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर जी छोटी छोटी राज्य आहेत. तिथे अतिशय बारकाईने निर्णय घेतला.

त्यामुळे बाहेरून पाठिंबा दिला. इथे काय झाले तर आत जाऊन बसले त्यामुळे ते उदाहरण देतात ते ठीक नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपसोबत आम्ही गेलो यात काही चूक नाही. जे जे लोक या देशात भाजपबरोबर गेले त्या प्रत्येकाचा एक इतिहास आठवा. अकाली दल आणि भाजपचं सरकार बनलं पुढे ते सरकार चालले नाही अकाली दलाला मोडतोड करायचा निर्णय तिथल्या लोकांनी केला. पंजाबमध्ये भाजपने अनेक वर्षे एकजूट होती ती उध्वस्त करण्याचे काम केले. तेलंगणा, बिहार, आंध्रप्रदेश याठिकाणी काही महिने सत्ता चालवली आणि जे सोबत आले तिथे काही महिने ठिक चालते आणि त्यानंतर मित्रांना भाजपने संपवले आहे. किंवा तिथल्या पक्षांची मोडतोड केली आहे.हेच सुत्र भाजपचे आहे. त्यामुळे आज कुणी जायचा निर्णय घेतला असेल तर तो घेऊ शकतात. परंतु तो पक्षात बसून घेतला असता तर ते अधिक चांगले झाले असते असेही शरद पवार म्हणाले.

ही गोष्ट लक्षात ठेवा की इतर राज्यात जे घडले ते वेगळे याठिकाणी घडणार नाही. आज सांगितले जाते की, आम्ही भाजपसोबत गेलो ती चूक केली नाही. तुम्ही शिवसेनेसोबत गेलात. शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. आणीबाणीच्या काळात संबध देशात इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशात वातावरण होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केले की देशाच्या या घटनेत इंदिरा गांधी यांना मदत केली पाहिजे. त्यांना पाठिंबा दिला. त्यांना सहकार्य इतके केले की विधानसभेची निवडणूक या राज्यात शिवसेनेने एकसुद्धा उमेदवार उभा केला नाही आणि कॉंग्रेसला पाठिंबा दिला. का तर आणीबाणीच्या नंतर एक वेगळे वातावरण होते. त्या वातावरणात आणखी कटुता वाढू नये यासाठी एकीसाठी हा निर्णय घेतला होता. मनोहर जोशी आणि दोघांना विधीमंडळात जागा दिली. इंदिरा गांधीच्या काळातसुद्धा शिवसेनेला कॉंग्रेसने पाठिंबा दिला. आणि आज असं सांगितलं जाते आहे की, तुम्ही शिवसेनेबरोबर गेलात, याचा अर्थ तुम्ही भाजपसोबत गेलात फरक आहे दोघांमध्ये असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…’ या दोन ओळी बोलून शरद पवार यांनी सभेची सांगता केली.

खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण

“श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी”

हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिला.

मी महिला आहे, छोटसं बोललं तर डोळ्यात टचकन पाणी येतं, पण संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच महिला अहिल्या, तीच ताराराणी आणि तीच जिजाऊ होते, अशी भावना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली.

आता ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे. ही लढाई एका व्यक्तीविरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढायची आहे, असे आवाहनही सुप्रियाताईं सुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला काही लोक नॅचरली करप्ट पार्टी असे बोलत होते. पण ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा, मुझे जरूरत पडेगी तो नॅचरली करप्ट पार्टी पुरा खा जाऊंगा’ असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देशाच्या राज्यकर्त्यांना लगावतानाच

या देशात सगळ्यात करप्ट पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पक्ष आहे, असा थेट आरोपही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.

काही लोक म्हणतात की ज्यांचे वय झाले त्यांनी केवळ आशीर्वाद द्यावेत. पण वय हा केवळ आकडा आहे, लढण्याची जिद्द हवी, असे प्रत्युत्तर सुप्रियाताईं सुळे यांनी दिले. आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद देण्याची वक्तव्यं करणाऱ्यांपेक्षा आमच्यासारख्या मुली परवडल्या असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. या परिस्थितीत आपण हताश व्हायचे नाही. आपण पक्ष पुन्हा बांधू शकतो हा विश्वासही सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला. जे गेलेत त्यांना आपल्या शुभेच्छाही दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोण यावर कार्यकर्त्यांमधून शरद पवार असा एकच आवाज उठला. त्यावर सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्याही बॅनरवर शरद पवारसाहेबांचा फोटो आहे. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणा विरोधात लढायचं आहे. भाजपने केवळ द्वेष पसरवला आहे. त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला उतरायचे आहे असे आवाहन केले.

सत्ता येते आणि जाते, मात्र केवळ सत्तेतून सुख मिळत नाही. आपल्याकडे ज्या खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत त्यावर नवीन लोकांना बसण्याची संधी मिळेल. आपण नवीन उमेदीने कामाला लागूया, ज्यातून महाराष्ट्राची जनता याच योद्ध्यामागे उभी राहील. जे अनेकदा महाराष्ट्राने दाखवले आहे ते पुन्हा एकदा आपल्याला करायचे आहे. ज्यातून ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि चिन्हं आपल्याकडे राहील. आपल्या पक्षाचा एकच शिक्का आहे ज्याचे नाव हे शरद पवार आहे, अशा शब्दात सुप्रियाताईं सुळे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

जयंत पाटील यांचे भाषण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या काळात हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना कधीच कुणी दाद दिली नाही, अशी स्पष्टोक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

कधीही कुणीही आदरणीय शरद पवार साहेबांपासून दूर गेले नाही. पण आज काही लोक दुर्दैवाने दूर गेले याचे शल्य आहे. आज या व्यासपीठावर पवारसाहेबांच्या डावीकडे आणि उजवीकडे बसणारे लोक नाहीत याचे आमच्या मनात शल्य आहे. जे गेलेत त्यांच्यावर मी भाष्य करत नाही. काही प्रश्न, विवंचना असतील. पण त्या सर्वांच्या मागे उभे राहण्याचे काम आदरणीय पवारसाहेबांनी एकदा नाही अनेकदा केले. त्याचे मूर्तिमंत उदाहरण अनिल देशमुख आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

मला प्रदेशाध्यक्ष बनून पाच वर्षे झाली. पाच वर्षे झाल्यानंतर एका महिन्याभराने पवारसाहेबांना भेटलो तेव्हा साहेबांना म्हटले की, पाच वर्षात कधीच सु्ट्टी घेतली नाही. आता सुट्टीचा टाईम आला आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल मला तो मान्य आहे. त्यानंतर साहेबांनी मिटींग घेतली. पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जिथे आपल्या पक्षाचे आमदार नाहीत अशा राज्यातील ठिकाणी कार्यकर्त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत त्यापैकी १५० पेक्षा जास्त मतदारसंघात जाण्याचे काम महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे होते आणि ते मी केले. पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात दोनदा जाऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आमच्याबरोबर अनेक लोक होते. शरद पवारसाहेबांनी अनेकांना मोठमोठ्या संधी दिल्या. पण आता विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत असं सांगायला लागले आहेत. दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर पुण्याला भेटले तेव्हा त्यांच्या डोक्यावर फुले पगडी पवारसाहेबांनी ठेवली होती. पगडी ठेवली तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का.. आता फुलेंचा विचार काढून ज्यांनी जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंची चेष्टा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले.. आता महाराष्ट्राला काय उत्तर देणार? असा थेट सवाल केला.

२०१९ मध्ये सरकार स्थापन करताना मंत्री म्हणून नाव देताना पवारसाहेबांनी पहिले नाव भुजबळ साहेबांचे दिले. तेव्हा बडवे आडवे आले नाही का.. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गैरसमज नसावा म्हणून मी हा खुलासा केला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आज देशात पक्ष चोरी करणाऱ्यांचा थयथयाट सुरू आहे. जो आम्हाला आवडत नाही, जो आडवा येतो त्याचा पक्षच आम्ही काढून घेतो. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तसाच मानस राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवून काही लोक काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय पटलावरून नामशेष करण्याची कोणी भूमिका घेत असेल तर माझे आवाहन आहे की अजून सर्वांनी विचार करा. शरद पवार या नावाचा झंझावात महाराष्ट्रात फिरायला लागला तर काय परिस्थिती होईल याची छोटीसी चुणूक सातारा आणि कराडमध्ये बघितलेली आहे. वय कितीही झाले तरी या नेत्याचा, या योद्ध्याचा भारतात दरारा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

अमोल कोल्हे साहेबांची क्लिप बघितली, ते म्हणाले की बापाला कधी विसरायचं नसतं, आपल्या बापाच्या चेहऱ्यावरील सुरकूत्या या कष्टाने निर्माण झालेल्या आहेत, हे मनात ठेवा. मी डॉ. अमोल कोल्हे यांना सांगेन की पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा. सर्व महाराष्ट्रात फिरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानाचा बाणा कसा जपला आहे हे तुम्ही सांगा. सर्व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे चाळीस आमदार गेले, त्यांची जी तक्रार होती तीच तक्रार पुन्हा तेथे येऊन बसली आहे. उद्धव ठाकरेंच्या आमदारांच्या मनात पुन्हा फिरायचे वेध लागलेले आहेत, ही काळ्या दगडावरील रेख लिहून घ्या, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

राजकारणात एवढी अस्वस्थता यापूर्वी पाहिली नव्हती. काही तत्त्वे, मर्यादा, धोरणे ही असली पाहिजेत. जर हे सोयीस्करपणे आपण सोडायला लागलो तर आपल्याला फॉलो करणारे काय म्हणतील याचाही विचार केला पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधानसभेत १०५ आमदार भाजपचे आहेत. त्या निष्ठावंतांपैकी केवळ आठ मंत्री झाले. म्हणजे दुसऱ्याची कबर खोदताना स्वत:चीच कबर खोदण्याचे काम महाराष्ट्रात सुरु आहे. महाविकास आघाडीला तीन पक्षांची रिक्षागाडी म्हणून हिणवले गेले पण रिक्षा एवढी चांगली चालत होती म्हणून त्यांनी ती रिक्षा मोडण्याचे काम केले, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

एखादा क्षण येतो जेव्हा माणूस विचलित होतो, तेव्हा त्याने स्वत:ला सावरून पुन्हा आपल्या मूळाकडे जायला हवे. ही मानसिकता दिसत नसल्याची खंतही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

मी जे बूथ कमिट्यांबद्दल आवाहन करत होतो, ते नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. बूथ कमिटी सक्षम केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही हा आग्रह मागील पाच वर्षांपासून मी करत आलो आहे. आगामी निवडणुका कधीही येऊ शकतात. आज पवारसाहेबांच्या मागे सामान्य माणसे उभी आहेत. आपण आदरणीय पवारसाहेबांना सक्षम असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार करून दाखवूया, यासाठी कामाला लागूया, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

लढाई केवळ पावसामुळे लढली जाते असे नाही, तर लढाई ही हुशारीने जिंकली जाते….

देशात संविधान तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. आमदार हा खरेदी-विक्री संघ आहे, की कांद्याचा भाव आहे अशी टीका पक्षाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्हाला आदरणीय शरद पवारसाहेब लागतात. आता अचानक तुम्ही म्हणता की, आम्हाला शरद पवार नको. तुम्ही साहेबांचा चेहरा का वापरता. तुम्ही मतदारांना आकर्षित करू शकाल असे चेहरे वापरावे. तुम्हाला निवडून आणण्यासाठी तोंडातून रक्त गळत असतानाही प्रचारासाठी उभ्या राहिलेल्या बापाला इतकं दुःख देता. ज्याला गुरु बोलायचे त्यालाच दुःख द्यायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पवार साहेबांना जखमी करून टाकलंय. पण हा जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जे आमदार पवार साहेबांसोबत आहेत ते वाचतील अन्यथा इतर सर्व घरी जातील, असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

शरद पवार माझी खासगी मालमत्ता आहे का अशी विचारणा केली जाते. मात्र ही सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायाची धूळ आहे. पण जेव्हा बापावर येते तेव्हा छातीचा कोट करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. इथे सर्व पांडव आहेत आणि आपला श्रीकृष्ण हे शरद पवार साहेब आहेत. इतिहास सांगतो की अधर्माविरोधात धर्माची लढाई होते, तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही. नाशिकला साहेब येणार तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र वर्मा, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, आमदार सुनिल भुसारा, आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, आमदार सुमन पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार चेतन तुपे, आमदार बाळासाहेब पाटील आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार एकनाथ खडसे, खासदार वंदना चव्हाण, खासदार फौजिया खान आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!