अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगामासाठी ३२८ मेट्रिक टन डीएपी वितरित केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात डीएपी खताची टंचाई जाणवत होती.
तालुक्यातील तूर , उडीद हे प्रमुख खरिपाची पिके आहेत. तालुक्यात तूर व उडीद या दोन्ही पिकाखाली सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तुर, उडीद, सोयाबीन या पिकांच्या पेरणीच्या वेळी डीएपी खत आवश्यक आहे. म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अक्कलकोट कृषि विभागाची मागणी लक्षात घेऊन सुमारे ३२८ मे.टन खताचा तालुक्यातील १७ कृषि सेवा केंद्रांकडे वितरणाचे आदेश दिल्याची माहिती वडखेलकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच ऊस पिकासाठीही पावसाळ्यापुर्वी डोस देण्यासाठी डीएपी खताची आवश्यकता आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची ओरड सुरु होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अक्कलकोट कृषि विभागाची मागणी लक्षात घेऊन सुमारे ३२८ मे.टन खताचा तालुक्यातील १७ कृषि सेवा केंद्रांकडे वितरणाचे आदेश दिले आहेत.











