गणेशोत्सव जल्लोषात साजरा करा पण नियमात राहून ! !
अक्कलकोटच्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे आवाहन
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२३ : कोरोनामुळे मागच्या तीन वर्षात उत्सवावर निर्बंध लादले गेले होते परंतु यावर्षी ते उठल्याने गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करा पण सण साजरा करत असताना उत्साहाचा उन्माद नको,शांततेत साजरा करा,असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रियदर्शनी मंगल कार्यालय येथे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेच्यावतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
आता पूर्वीसारखे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला हेलपाटे मारण्याची गरज नाही. परवानगीसाठी ऑनलाईनची सुविधा देण्यात आली आहे त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये परवानगी घ्यावी तसेच पोलीस स्टेशनचे जे नियम आहेत त्या नियमात राहून नियमांचा भंग न करता उत्साहात जल्लोषात हा सण साजरा करा,असे ते म्हणाले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनीही गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत हा उत्सव शांततेत
साजरा करण्याचे आवाहन केले.अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क करा,असेही ते म्हणाले.गटविकास अधिकारी सचिन खुडे, मुख्याधिकारी सचिन पाटील यांनीही हा उपक्रम विधायक कार्यक्रमाने साजरा करावे,असे आवाहन केले.यावेळी
शिवशरण जोजन,एजाज मुतवल्ली,योगेश पवार,चंद्रशेखर मडीखांबे,उत्तम गायकवाड,जेष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करून सूचना केल्या.सुनील बंडगर यांनी काही लोक उत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी मागतात त्यांच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे,असे सांगितले तर दिलीप सिद्धे यांनी अक्कलकोट शहर शांततेत हा सण साजरा करेल,असे अभिवचन दिले.या बैठकीला उत्तरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी दक्षिणचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे,नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,पक्षनेते महेश हिंडोळे,बसवराज अळोळी,सुनील खवळे,वसंत देडे, तम्मा शेळके, अमर शिरसाठ,
प्रवीण घाडगे,सिद्धू माळी,सद्दाम शेरीकर,महावितरणचे अधिकारी माडेकर आदिंसह पोलीस पाटील व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी मानले.