अक्कलकोट मृत्यू दराच्या बाबतीत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर !मृत्युदर रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान !
अक्कलकोट, दि.२४ : जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट
होत चालली आहे.अशा परिस्थितीत
अक्कलकोट तालुका मृत्यूदराच्या
बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
त्यामुळे नागरिकातूनही चिंता व्यक्त
होत आहे.यात सोलापूर शहराचा
मृत्यूदर ४.२१ असून मागच्या आठ
ते पंधरा दिवसात त्याचाही दर वाढला
आहे.
अकरा तालुक्यांपैकी दक्षिण सोलापूरचा सर्वाधिक म्हणजे ६.०४ टक्के मृत्यूदर आहे.मंगळवेढ्याचा मृत्यूदर दोन टक्केच्या आसपास असून अन्य तालुक्यांत देखील आता हळूहळू मृत्यूचे प्रमाण कमी- अधिक स्वरूपात वाढत चालले आहे.
आज रुग्णसंख्येच्या तुलनेत इतर तालुक्यात मृत्यूदर कमी असल्याचे दिसत आहे.आतापर्यंतच्या पाहणीत असे निदर्शनास येत आहे की,रुग्णांना अगदी शेवटच्या टप्प्यात त्रास सुरू झाला की दवाखाने गाठतात.त्यावेळी उपचार करणे मुश्कील होते.त्यामुळे मृत्यू दर कमी ठेवणे
प्रशासना समोरचे आव्हान बनले आहे.
यात त्रास होत असतानाही आजार अंगावर काढणे,लक्षणे असतानाही टेस्टसाठी नकार देणे,पॉझिटिव्ह व्यक्तींकडून संपर्कातील व्यक्तींची नावे लपविणे,मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन न करणे,रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास विलंब करणे आदी कारणांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यातील विषाणूचा संसर्ग भयानक वाढला असून लहान मुलांपासून सर्वांनाच याचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.उपचारासाठी विलंब केल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे,असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.थोडा जरी त्रास झाला तरी रुग्णाने तात्काळ हॉस्पिटल मध्ये येऊन उपचार घेणे गरजेचे आहे.
तरच आरोग्य विभागाला देखील मृत्युदर रोखणे सोपे होणार आहे अन्यथा हे वाढतच
जाणार आहे.त्यासाठी प्रत्येकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे.