कोव्हिडंमुळे अक्कलकोट आगाराच्या एसटी चालकाचा मृत्यू,भीतीचे वातावरण, बेस्टच्या ड्यूटया रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट एसटी आगारातील एका चालकाचा मृत्यू कोव्हिडंमुळे झाल्याने मुंबई बेस्ट परिवहनच्या ड्यूटया रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.अक्कलकोट एसटी आगारातील काही कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये महापालिकेच्या बेस्ट परिवहन सेवेसाठी पाठवण्यात येत आहे.हे धोक्याचे आहे. सध्या कोव्हिडंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे या ड्युट्या रद्द करण्यात यावेत,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी निवेदनाद्वारे आगारप्रमुख रमेश म्हंता यांना केली आहे तसेच विभाग नियंत्रकांना
देखील याबाबत कळविण्यात आले आहे.
शुक्रवारी, अक्कलकोट आगारातील चंद्रकांत रेड्डी नावाच्या बस चालकाचा कोव्हिडंमुळे मृत्यू झाला ही बाब चिंताजनक असून यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांत देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आणि मानसिक स्थितीचा कुटुंबाचा विचार करून या ड्यूटया रद्द करण्यात यावेत,अशा प्रकारची मागणी सिद्धे यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. शनिवारी,
आगार प्रमुख रमेश म्हंता यांना संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशचंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.यावेळी स्थानक प्रमुख चव्हाण,वाहतुक नियंत्रक संभाजी पवार,मदन घाटगे,योगीराज सिद्धे,नामदेव कोळी,सुधाकर बोकडे, श्रीमंत खसगी यांचेसह सर्व एसटी कामगार संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.