बंगळुरू : जगातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्च इंजिन गुगलने भारतीयांची माफी मागितली आहे. कंपनीने आपल्या सर्च इंजिनच्या माध्यमातून कन्नड भाषेला भारतातील सर्वात घाणेरडी भाषा म्हटले होते. यानंतर भारतीयांकडून गुगलचा कडवा विरोध झाला. गुगलला आपली चूक लक्षात आली आणि त्याची माफी मागण्यात आली आहे.
सर्च इंजिन कंपनीने दावा केला,की हे कंपनीचे विचार नसून एक तांत्रिक बिघाड होता. गुगलवर जेव्हा लोकांनी ‘ugliest language in India’ (भारतातील सर्वात घाणेरडी भाषा) असे सर्च केले असता रिझल्टमध्ये ‘कन्नड भाषा’ असे दिसून येत होते. कर्नाटक सरकारने सुद्धा याला तीव्र विरोध केला.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि बंगळुरूचे भाजप खासदार पी.सी. मोहन यांच्यासह अनेकांनी गुगलच्या या चुकीवर तीव्र आक्षेप नोंदवला.गुगलला ही चूक सुधारून माफी मागायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.