मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावालल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो मुंडे सर्थकांनी राजीनामा दिले आहे. यापार्श्वभुमीवर मुंडे समर्थकांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केला.
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात”, अशी भूमिका पंकजा यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. मला मंत्रिपदाची आणि खुर्चीची लालसा नाही असे स्पष्ट करतानाच जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे धर्मयुद्ध टाळण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी मुंबईत नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना केले.
आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
यावेळी बोलताना आपलं घर आपण का सोडायचं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण हे घर उभं केलं ते आपण का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू असेही त्या सूचकपणे म्हणाल्या. मी कुणालाच भीत नाही, पण मी सर्वांचा आदर करते. माझे संस्कार निर्भय आणि संस्कारीत राजकारणाचे आहे. मी माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा कधीही अनादर केला नाही असेही त्या म्हणाल्या.