ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खरं लिहायला धाडस लागतं :श्रीकांत मोरे, जागवल्या त्या आठवणी पुस्तकाचे प्रकाशन

सोलापूर : खरं लिहायला धाडस लागतं, ते धाडस डॉ.हेबाडे यांनी केले आहे. जागवल्या त्या आठवणी या पुस्तकात काल्पनिकता, खोटेपणा कुठेही नसून अनुभवसिद्ध असे पुस्तक असल्याचे गौरवोद्गार मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे यांनी काढले. जागृती पब्लिकेशन प्रकाशित माजी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान हेबाडे लिखित जागवल्या त्या आठवणी या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दुपारी समाज कल्याण सभागृहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शहराध्यक्ष डॉ. श्रुतिश्री वडगबाळकर, न्या. श्रीकांत साळुंखे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, जेष्ठ कवी देवेंद्र औटी, लेखक डॉ. भगवान हेबाडे, जागृती पब्लिकेशनचे विजय गायकवाड, उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीकांत मोरे पुढे बोलताना म्हणाले, या पुस्तकात प्रचंड आशावाद आहे. आशावादी माणूस जीवनात यशस्वी होतो. प्रत्येकाला हे माझ्या जीवनात घडलं आहे, असे पुस्तक वाचताना वाटते. यात आनंदाचे क्षण असून जीवनातले आनंद टिपले आहेत. भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ या पुस्तकात नमुद आहेत.त्यामुळे प्रत्येकजण या पुस्तकात समरस होतो.

यावेळी बोलताना मसाप शहराध्यक्ष श्रुतिश्री वडगबाळकर म्हणाल्या की, डॉ. हेबाडे यांच्या आत्मकथनात माणुसकीचे दर्शन घडते. तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती दिसून येते. या पुस्तकात आशेचा किरण आहे. तक्रारीचा सूर नाही. आशावाद असल्याने “जागवल्या त्या आठवणी” हे प्रेरक पुस्तक आहे. प्रारंभी ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांनी प्रास्ताविक केले.डॉ भगवान हेबाडे यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक लेखनाचा प्रवास मांडला. सूत्रसंचालन पियुशा शिंदे यांनी केले तर प्रकाशक विजय गायकवाड यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!