मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोरदार बॅटींग सुरू असून त्याचा जोर कायम आहे. कोकण किनारपट्टी आणि पुण्याच्या घाट परिसरात पावसाने धुमशान घातला आहे.
सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून या पाचही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.जून महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनने राज्यात दीर्घ ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यात मान्सूनने पुन्हा वापसी केली आहे. सद्या मान्सून देशात सर्वत्र व्यापला आहे.
हवामान खात्याने नुकताच जारी केलेल्या सॅटेलाईट इमेजनुसार कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यात ढगांनी मोठया प्रमाणात दाटी केली आहे. त्यांनतर राज्यात टप्याटप्याने पावसाचं जोर कमी होणार आहे.
दरम्यान मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, जालना परभणी नांदेड या सात जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या सात जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या दरम्यान तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहणार आहे.