अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची बसअभावी पायपीट सुरू आहे. शाळेसाठी स्वतंत्र स्कूलबस सुरू करण्याची मागणी संस्थेच्यावतीने अक्कलकोट बस डेपोकडे करण्यात आली आहे. अक्कलकोट शहरापासून चार किलोमीटर अंतरावरती ही नागनहळळी आश्रम शाळा आहे.ही आश्रम शाळा जिल्ह्यात रोल मॉडेल आहे या आश्रम शाळेचा विद्यार्थी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम आला आहे. भटक्या विमुक्त जमातीतील अनेक मुले मुली जे निराधार आहेत ते या शाळेमध्ये शिकत आहेत. त्यांना सध्या बस नसल्याने शाळेला चालत जाण्याची पाळी आलेली आहे.२५ ते ३० मुली आहेत ज्या रोज शाळेला चालत जात आहेत त्यांना शाळेच्या वेळेत स्वतंत्र बस सुरू करावी, अशी मागणी संस्थेचे सचिव जावेद पटेल यांनी अक्कलकोट आगार व्यवस्थापक मदनीपाशा जुनेदी यांच्याकडे केली आहे.मुलींसाठी स्वतंत्र बस सुरू केल्यास मोठी सोय होणार आहे.मुली चालत जात असल्याने त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर आहे ही बाब लक्षात घेऊन अक्कलकोट आगाराने तात्काळ ही बस सेवा सुरू करावी. जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागणार आहे.या शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने याठिकाणी मुला-मुलींची संख्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या शाळेची अडचण प्रशासनाने दूर करावी,अशी मागणी शिक्षक, पालक वर्गातून देखील केली जात आहे.
बस सोडण्यासाठी
सकारात्मक
संस्थेने आम्हाला निवेदन दिलेले आहे हे निवेदन विभागीय कार्यालयाकडे पाठवलेले आहे त्या ठिकाणाहून आदेश येताच विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली जाईल आणि शाळेच्या वेळेत बस सोडली जाईल.आम्ही याबाबत सकारात्मक आहोत.
मदनीपाशा जुनेदी,आगार व्यवस्थापक