सोलापूर,दि.२९ : भीमा नदीत पात्रात लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तानवडे व पारशेट्टी परिवारातील चारजण वाहून गेल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी साडेतीन वाजता घडली.याबाबतची माहिती मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली आहे.
नदीत पोहायला गेलेल्या वडिलाच्या मागे- मागे त्यांच्या दोन मुली आणि गावातच राहणाऱ्या त्यांच्या बहिणीचा नऊ वर्षांचा मुलगा व अकरा वर्षांची मुलगी हे दोघेही नदीच्या दिशेने आले. तानवडे यांच्या १३ वर्षीय मुलीला व त्यांच्या बहिणीच्या १३ वर्षीय मुलीला पोहायला येत असल्याने त्या दोघीही नदीत उतरल्या. त्यानंतर नदी काठावरील तानवडे यांची नऊ वर्षीय मुलगी आणि बहिणीचा ११ वर्षांचा मुलगाही पाण्यात उतरला. परंतु, प्रवाह वाढल्याने चारही मुले वाहून जाताना वडील शिवाजी तानवडे यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी सुरवातीला त्यांच्या जवळ असलेल्या दोन मुलांना धरले आणि नदी काठावर आणून सोडले. नदी काठावर आल्यानंतर पाणी थोडे असल्याने ते दोघेही सुखरूप जातील असा त्यांना विश्वास होता. त्यानंतर ते दुसऱ्या दोघांना आणायला गेले. मात्र, तोवर प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले. दरम्यान, काठापर्यंत सोडलेली दोन्ही मुलेही वाहून गेली होती, अशी हृदयद्रावक हकीकत शिवाजी तानवडे यांनी मंद्रूप पोलिसांसमोर सांगितली.
लवंगी गावातील शिवाजी तानवडे यांची दोन मुले व त्यांच्या बहिणीची दोन मुले भीमा नदीत वाहून गेली आहेत. मासेमारी करणाऱ्या तरुणांकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पावसामुळे अडथळा आला.या मुलांचा रविवारी घेतला जाणार आहे. अजूनही नदीच्या पात्राचा अंदाज येत नसल्याने पालकांनी मुलांना त्या ठिकाणी घेऊन जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे