मुंबई : राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला होता. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसात होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि उच्च, तंत्र शिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातला पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. आता काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. यामध्ये ग्रामीण भागात जिथे ८ वी ते १२वी याआधीच सुरू आहेत, तिथे ५वी ते ७वीचे वर्ग देखील सुरू करणे आणि नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगर पालिका या ठिकाणी रुग्णसंख्या आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या भागांमध्ये ५वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं.
वर्षा गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिलासादायक चित्र निर्माण झालं होतं. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता आता वाढू लागली आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधांमध्ये शिथिलता निर्माण करण्याबाबतच्या घोषणा करतानाच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असं स्पष्ट केलं होतं.