ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आठवणींपर लेखनातून समाजजीवनाचा आलेख प्रतिबिंबित होतो – प्रा.डॉ. सुहास पुजारी

सोलापूर  : “आपण ज्या सामाजिक क्षेत्रात वाढलो, घडलो आणि मोठे झालो त्याच्या नोंदी असाव्यात असे प्रत्येकाला वाटते. त्या संपन्न गोष्टी पुढल्या पिढीला सांगावे असे वाटते. व्यक्तिपरत्वे मनुष्याच्या जडणघडणीत अनेकांचे हातभार लागलेले असतात. त्या व्यक्तिमत्वांचे मोठेपण अनेक अंगाने श्रेष्ठ असते. हे सारे जाणून ते शब्दबद्ध व्हावेत असं वाटताना लेखन जन्माला येते आणि त्याच लेखनातून तात्कालीन सामाजिक स्थित्यंतराचे दर्शन घडते.” असे प्रतिपादन मसाप सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले.

संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. राजाभाऊ ढेपे यांच्‍या ‘आठवणींचे वारूळ ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर चव्हाण यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

प्रारंभी जयश्री ढेपे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून हेतू स्पष्ट केला. त्यानंतर शब्दसुमनांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर डॉ. चव्हाण यांच्या हस्ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी लेखकाच्या मनोगतात प्राचार्य ढेपे यांनी आपल्या शाळेपासून ते प्राचार्यपदापर्यंतचा प्रवास या पुस्तकात आला असून आठवणींच्या रूपाने अनेक संपन्न गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी केला असल्याचे म्हणाले.

याप्रसंगी ढेपे कुटुंबियातील सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री ढेपे यांनी केले तर आभार कीर्ती ढेपे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!