ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत तहसीलदारांनी दिल्या ‘या’ सूचना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुका चुरशीच्या होत असतात याकरिता सर्व आर .ओ. व झड .ओ. यानी पारदर्शक व काटेकोर नियमाप्रमाणे निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसीलदार अंजली मरोड यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या तयारी बैठकीत दिल्या.

तहसील कार्यालय अक्कलकोट येथे तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आर .ओ.व झेड .ओ. यांची बैठक सोमवारी पार पडली . या बैठकीस मार्गदर्शन करताना तहसीलदार अंजली मरोड या सूचना देत होत्या . या बैठकीत अर्ज भरण्यापासून ते मोजणी पर्यंतच्या विविध कामाविषयी चर्चा करण्यात आल्या . १५ डिसेंबर निवडणुकीच्या नोटिसा बजावण्याचे असून २३ ते ३० डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे . या काळात २५ , २६ , २७ डिसेंबर या दिवशी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. उमेदवारांना पाच दिवसाची अर्ज भरण्याकरिता संधी मिळालेली आहे. ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात .३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून अर्जाची माघार ४ जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे व त्याच दिवशी दुपारी तीन नंतर चिन्ह व यादी देण्यात येणार आहेत .१५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी ही १८ जानेवारी रोजी होणार आहे .२१ जानेवारीपर्यंत तालुक्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

७२ ग्रामपंचायतीमध्ये २३५ प्रभाग असून २९५ केंद्र आहेत .४जानेवारी चिन्ह वाटप झाल्यापासून ते १३ जानेवारी सायंकाळी पाच तीस वाजेपर्यंत उमेदवार आपला प्रचार करू शकतो .एका उमेदवाराला एका प्रभागातील एका जागेवर निवडणुका लढविता येतील व बहूप्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी तो उभा राहू शकतो. आचारसंहितेच्या काळामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विकास कामाचे उदघाटन व निधी देता येत नाही. या निवडणुकीत उपजिल्हाधिकारी निरीक्षक म्हणून राहणार आहेत. या बैठकीस तहसिलदार अंजली मरोड सह सर्व आर .ओ., झेड. ओ. व नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुका या ग्रामीण भागामध्ये फार प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. इतर निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येते .उमेदवार व मतदार यांचा निकडचा संपर्क या निवडणुकीमध्ये दिसून येतो .यामुळे ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी होत नसते. शासनाने यावेळी सरपंच निवडीचा आरक्षण निवडणुकीच्या नंतर ठेवल्याने नेहमीपेक्षा या निवडणुकीमध्ये चुरस कमी प्रमाणात दिसून येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!