अहमदनगर: कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातून सरकारी वकील अॅड. बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतल्यामुळे गोंधळ उडाला. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता यासाठी नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती करावी लागणार आहे.
इंदोरीकर महाराज वादगस्त वक्तव्य प्रकरणी आज संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. पण, अचानक सुनावणीच्या काही तासांआधीच सरकारी वकिलांनी माघार घेतली. सरकारी वकिलांनीच माघार घेतल्यामुळे आज सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी होणार आहे. आज दोन्ही बाजुंनी युक्तिवाद केला जाणार होता. पण सरकारी वकिलांनी अचानक खटल्यातून माघार घेतली.