नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करून निषेध व्यक्त करीत आहे. त्यातच आता केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे.
बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून पद्मविभूषण परत केला. या पत्रात ते म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाही या गोष्टींचा निषेध करत मी मला मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे असंही प्रकाश सिंह बादल यांनी म्हटलं आहे.
“मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे कृषी कायदे त्यांच्या सोयीचे नाहीत. मी आज जो काही आहे तो लोकांमुळे आहे. लोकांनी मला निवडून दिलं आहे. त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश आहे. आज त्या शेतकऱ्यालाच या सरकारकडून फसवलं जातं आहे. अशा वेळी पद्मविभूषण पुरस्कार बाळगण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नाही त्यामुळे मी तो परत करण्याचा निर्णय घेतला आहे.”
दुसरीकडे काँग्रेसनंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. ससंदेचं विशेष अधिवेशन बोलावून केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी चौधरी यांनी पत्राद्वारे केली आहे.