ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामपंचायत निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान स्वतंत्र मोजू नये, शिक्षक समितीचे तहसीलदारांना निवेदन

 

अक्कलकोट,दि.१७ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान स्वतंत्रपणे जाहीर न करता ते एकत्रितपणे जाहीर करावे, अशी मागणी अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्याकडे केल्याची माहिती तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपेक्षा वेगळी असते.वार्डनिहाय मतदानप्रक्रिया असल्यामुळे एखाद्या वार्डात एक किंवा दोनच कर्मचारी मतदार असतात.ग्रामपंचायत निवडणुकांचे निकालही कमी मतांच्या फरकांनी लागतात.विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचा फरक अल्प असतो.पोस्टल बॅलेटचे मतदान स्वतंत्ररित्या मोजल्यामुळे सदर कर्मचाऱ्याने कोणत्या उमेदवाराला मत दिले,हे समजत असल्यामुळे कमी मताने पराभूत होणाऱ्या उमेदवाराच्या रोषाला कर्मचाऱ्याला नाहक बळी जावे लागणार आहे.म्हणूनच अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीने तातडीने तहसीलदार यांना निवेदन दिले.सर्व कर्मचाऱ्यांचे मतदान मोजून पोस्टल बॅलेटची स्वतंत्र आकडेवारी जाहीर न करता ,ती आकडेवारी मतदानयंत्रांच्या मतांमध्ये धरून एकत्रितपणे जाहीर करावी,अशी मागणी केली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार, सरचिटणीस होन्नपा बुळळा,कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,संतोष दांगट, दयानंद चव्हाण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!