ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात काँग्रेसचे आंदोलन

मुंबई :  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी दिल्लीमध्ये गेल्या सात दिवसपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही.

अशावेळी शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष आज, गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी दिली. भाजप सरकारच्या या शेतकरीविरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. हे काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मागील दोन महिने सातत्याने विविध आंदोलने करून विरोध व्यक्त केलेला आहे.

 

राज्यव्यापी आंदोलनातही मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन आपला विरोध व्यक्त करतील, असे थोरात म्हणाले. भाजप सरकार जाहिरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. भाजपच्या कथनी आणि करनीमध्ये अंतर असल्याने शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्याप्रमाणे केंद्राने कायद्यात बदल करावा. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबरपणे उभे आहोत, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!