मुंबई | शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सातत्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना बघायला मिळतात. त्यातच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आता नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपाला शरण गेले,” असा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. “या गुन्ह्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार होते,”ही केस उघडली तर नितेश राणे तुरुंगात जातील, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
कणकवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले,”नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे अखेर परवानगी दिल्याचा दावा राऊत यांनी केला. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा राजकीय सल्ला राऊत यांनी नारायण राणे यांना दिला आहे.