भाजपवाले बोलल्याप्रमाणे वागत नाहीत : सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिक्रिया,पत्रकारांच्या प्रश्नांना दिली उत्तरे
सोलापूर, दि.३१ : अक्कलकोट तालुक्याच्या हिताचा उजनी एकरूखचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी थांबला होता. हे काम करून घेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाच्या संपर्कात आलो, यात वैयक्तिक स्वार्थ नव्हता. तालुक्याचे हितच होते, असे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हटले आहे.
भाजपचे खरे स्वरूप आपल्याला माहित आहे. म्हेत्रे घराणे कायम कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. हा इतिहास संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. भाजपवाले बोलल्याप्रमाणे वागत नाहीत. तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी उजनीचे पाणी येणे गरजेचे आहे. केवळ प्रशासकीय मान्यतेमुळे काम थांबून होते. यासाठी आपण भाजपा नेतृत्वाशी संपर्क वाढवून हे काम सांगून करून घेतले, असेही स्पष्टीकरण म्हेत्रे यांनी दिले.
मार्केट कमिटी पंचायत समितीच्या स्थानिक राजकारणात आम्ही भाजपला निश्चित त्यावेळी मदत केली. यात तालुक्याचे हित डोळ्यासमोर ठेवले होते. स्वतःचा स्वार्थ नाही. आता उजनीचे काम मार्गी लागले आहे. यात मोठा आनंद आहे. आम्ही काँग्रेसबरोबर होतो आणि राहणार आहोत, असेही म्हेेत्रे यांनी स्पष्ट केले.