जळगाव: : महाराष्ट्रातील आणखी एक जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील यश देशमुख यांना वीरमरण पत्करावे लागले आहे. यश देशमुख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रूजू झाले होते.
हा हल्ला श्रीनगर शहराबाहेरील एचएमटी परिसरात झाला. दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर बेछूट गोळीबार केला. रहदारीचा भाग असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका पोहचू नये, यासाठी लष्कराच्या जवानांनी कारवाईदरम्यान संयम बाळगला. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
यश देशमुख यांच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.