मुंबई,दि.२७ : सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे महाभयंकर संकट आहे,अशा परिस्थितीत राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेचा पुढचा टप्पा म्हणजे आपले राज्य देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता करणारे राज्य ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीत नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत त्याचा दर्जा कायम ठेवून ती अधिक परिणामकारक कशा पद्धतीने राबवता येईल,याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी या आढावा बैठकीत केले.या बैठकीला पालक सचिव व इतर अधिकारीही उपस्थित होते.