मुंबई । राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळली. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा घेरलं आहे.
ठाकरे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलं नाही. पूरग्रस्तांना फक्त तीन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. अजितदादा हे योग्य वाटतं का? असं विचारतानाच राजा उदार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आला, अशी अवस्था सध्या राज्याची असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही एक पुस्तिकाच प्रकाशित करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. तसेच देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आजही कोरोना उतरणीला लागला असताना सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.
जलयुक्त शिवारची खुशाल चौकशी करा?
जलयुक्त शिवार योजनेची राज्य सरकारने जरूर चौकसी करावी, आमचा या चौकशीला विरोध नाही. पण जलयुक्त शिवार योजनेमुळे ज्या पाच हजार गावात परिवर्तन झालं त्याची यशोगाथाही मांडा, असं ते म्हणाले. जलयुक्तच्या साडेसातशे तक्रारीची चौकशी करण्यात येणार आहे. आम्हीही चौकशी करणार होतो. तुम्ही करताय ठिक आहे. पण पाच लाख कामं झाली. त्यात फक्त सातशेची चौकशी होणार आहे. ही एका विभागाची कामे नाहीत. ग्रामविकास, कृषी, जलसंधारण विभागाची कामांचाही त्याच्यात समावेश आहे, असंही ते म्हणाले.