ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने अजित पवार संतापले ; म्हणाले…

पुणे । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी थंड बस्त्यात टाकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर ते बोलत होते.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना आम्ही 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही राज्यपालांना देण्यात आलं. याशिवाय आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही 171 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, आता राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.

 

राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावं लागेल. किती काळ थांबायचं हे विचारलं पाहिजे. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळ वेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!