पुणे : राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.