अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील हंद्राळ गाव या पंचवार्षिक निवडणुकीत देखील बिनविरोध झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व गावकऱ्यांनी
एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करून तालुक्यासमोर आदर्श ठेवला आहे.तसे पाहिले तर गेल्या चाळीस वर्षांपासून याठिकाणी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव यांची सत्ता अबाधित आहे.यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सुरेखाताई काटगाव यांच्या पुढाकारातून बिनविरोधची संकल्पना पुढे आली त्याला गावकऱ्यांनी साथ दिली. त्यानंतर जेष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव यांनी सर्वांना विश्वासात घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा संकल्प सोडून सर्व गावकर्यांशी व नेते मंडळींशी चर्चा करून हा निर्णय घेतला.या ग्रामपंचायतीची १९७७ मध्ये स्थापना झाली त्यानंतर तीन – चार वर्षाचा अपवाद वगळता काटगाव गटाचेच या गावावर वर्चस्व राहिले आहे.या गावांमध्ये आतापर्यंत फक्त दोन वेळा निवडणूक लागली आहे. आम्ही विरोधकांना ‘विरोधक’ कधीच समजत नाही म्हणून सर्व गावकरी साथ देतात. गावचा विकास हेच आमचे सर्वांचे ध्येय राहील, कोणाच्याही बाबतीत दुजाभाव केला
जाणार नाही, आतापर्यंत आम्ही अशाच पद्धतीने काम करत आलो आहोत म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली मुलीला सभापती केले, असे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव यांनी सांगितले.ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल माजी सभापती सुरेखाताई काटगाव यांनी आभार मानले आहेत. काटगाव हे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे
यांचे कट्टर समर्थक मानले जातात.ज्या पद्धतीने दुधनीत कै.सातलिंगप्पा म्हेत्रे आणि जेऊरमध्ये कै. महादेव पाटील त्यापद्धतीने हंद्राळमध्ये मल्लिकार्जुन काटगाव यांनी सत्ता कायम राखली आहे. यावेळच्या निवडणुकीत प्रभाग एक मधून मल्लिकार्जुन काटगाव,सविता गायकवाड,गंगाबाई तळवार, प्रभाग दोन मधून लक्ष्मीबाई हालोळी, रेवणसिद्ध तडवळ, प्रभाग तीन मधून इरणा पुजारी, जयश्री तुपद हे
७ उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले आहेत.गाव बिनविरोध करण्यासाठी माजी सभापती सुरेखा काटगाव, मल्लिकार्जुन काटगाव,शिवानंद तूपद, मनोज कारले,श्रीशैल बिराजदार,गणपती हालोळी, श्रीशैल काटगाव,धर्मणा विजापूरे, भीमाशंकर पुजारी,विठ्ठल हन्नूरे,काशिनाथ काटगाव, लाडप्पा गायकवाड, सातप्पा पुजारी, सिद्धू
पुजारी आदींनी परिश्रम घेतले.