मुंबई,दि.१० : वर्धा येथील सेवाग्राम आश्रम जगभरातल्या गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल,अशा पद्धतीचे काम आपण करू,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
सेवाग्राम विकास आराखडयातील विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.त्यावेळी ते बोलत होते.महात्मा गांधी एक विचार असून त्यांनी संपूर्ण भारताला खेड्याकडे चला असा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.देशाचा विकास करायचा असेल तर खेड्यांचा विकास होणे गरजेचे आहे,असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सेवाग्राम आश्रम,पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही,त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि विनोबा भावे यांना अभिवादन करण्यात आले.