शासनाने कोविड कालावधीमध्ये केलेल्या आरोग्य सेवा व आरोग्य साहित्याचे दर निश्चितीकरणामुळे सर्वसामान्यांना दिलासा : नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 1 : कोविड कालावधीमध्ये राज्य शासनाने समाजाच्या हितासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयाचा फायदा अनेक गरीब नागरिकांना झाला. शासन आपल्या पाठीशी असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात रुजली, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
जन स्वास्थ्य अभियान, महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर वेबिनारद्वारे चर्चा करताना त्या बोलत होत्या. ज्या रुग्णालयांना शासकीय जमीन अथवा शासकीय निधी देण्यात आलेला आहे किंवा वैद्यकीय महाविद्यालय जोडलेले आहे अशा हॉस्पिटलना सामाजिक बांधिलकी म्हणून काही बेड आरक्षित करणे व बिलामध्ये सवलत देणे याबाबत काटेकोर अंमलबजावणीसाठी शासन प्रयत्न करेल, असे डॉ.गोऱ्हे म्हणाल्या. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेला मुदत वाढ द्यावी याबाबत आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.