मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काही दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, याचं मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
वीज बिल माफी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की, सर्व निर्णय अजित पवार घेत आहेत. त्यामुळे आमचा थेट सवाल आहे की महाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार?. असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
वंचित बहुजन आघाडीची पुढील भूमिका म्हणजे वीज बिलं भरू नका, जर तुमची लाईट कापण्यात आली तर वंचित बहुजन आघाडीकडून लाईट जोडून देण्यात येईल. राज्यात मोठ्या संख्येने नागरिक कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेत आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की लॉकडाऊनची गरज नाही. पूर्वी देखील मी विरोध करत होतो आणि आता देखील करत आहोत. भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्याच काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.