ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसासाठी मैंदर्गी ग्रामस्थांनी लावले चक्क गाढवाचे लग्न ; जोरदार पाऊस बरसण्यासाठी वरुणराजाला साकडे !

गुरुशांत माशाळ

दुधनी : सद्या राज्यात चित्र विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याकडे मात्र पाठ फिरवली आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी आभाळाकडे डोळे मिटून पावसाचा वाट बघत बसले आहेत. त्यामुळे मैंदर्गी ग्रामस्थांनी चक्क गाढवाचे लग्न लावून पावसासाठी प्रार्थना केली.

संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात पावसाने दडी मारल्याने जनावराच्या चाऱ्याची आणि पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने नागरिकांच्या हाताला काम देखील नाहीये. पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने माणसाबरोबर जनावरांचेही हाल होत आहे. दीड महिना लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. वरुणराजाची कृपा दृष्टी व्हावे म्हणून अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी शहरातील ग्रामस्थांनी (नर – मादी) गाढवांचा लग्न लावून त्यानंतर हलगीच्या निनादात वरात देखील काढली. या लग्न सोहळ्याला ग्रामस्थ शहरातील शिवचलेश्वर मंदिर परिसरातील मैदानात मोठ्या प्रमाणात एकत्रित जमले होते. यावेळी दोन्ही गाढवांना विधिवत प्रमाणे हळद लावून आंघोळ घालण्यात आले. त्यानंतर मंगलाष्टकसह अक्षता सोहळा संपन्न झाला.

सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने दुष्काळी जिल्हा हा नाव पुसला गेला असं मानलं जात असताना पुन्हा तीच परिस्थितीची पुनरावृत्ती झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात कायम पावसाची काही सांगता येत नाही अशी स्थिती असते. कधी अतिवृष्टी होते तर कधी दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी एक ना एक संकटात सापडला जातो. पाऊस जास्त झाला तर ओला दुष्काळ पडतो तर पावूस पाठ फिरविली तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. पावसाळा सुरू होऊन दिड महिना लोटला तरी संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात पावसाचा एक थेंब पडला नाही. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया जाणार तर नाही अशी भीती शेतकऱ्यामध्ये दिसून येत आहे.

जून आणि जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होणे गरजेचे असते मात्र पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे, कोरडे ठाक आहेत. पावूस नसल्याने याचे परिणाम भूजल पातळीवर होत आहे. यामुळे कूपनलिका, विहिरीमध्ये पाणी साठ्यात कमी होत चालले आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त हे खरीप हंगामवर अवलंबून असतो. मात्र यदांच्या हंगामात एक ही पावूस न पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. एखादा मोठा पावूस पडताच पेरणीला सुरुवात होणार आहे. मात्र पावूस काय पडण्याचा नावच घेत नाहीये. यामुळे गढवांचे लग्न लावून पावूस पडावे यासाठी वरुण राजाला साकडे घातले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!