मुंबई : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून टीका केली आहे. ‘जे राजकीय पक्ष सातत्यानं देशातील निवडणुकांमध्ये पराभूत होत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर राजकारण करायचं आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याची चिंता आहे. शेतकऱ्यांचं भविष्य त्यांच्यासाठी गौण आहे,’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
‘महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची ४७ वर्षे, दोन महिने, एक दिवस त्यांची सत्ता होती. शिवसेनेसोबतचं एक वर्ष जमेस धरल्यास हा आकडा ४७ वर्षे, दोन महिने, एक दिवस इतका होतो. दुसरीकडं, देशात काँग्रेसची ५२ वर्षांहून अधिक काळ त्यांची सत्ता होती. मग असं काय झालं की ज्या कृषी क्षेत्राला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी म्हणायचो, त्याची व्याख्या का बदलली? याचं कधी चिंतन केलं आहे का?,’ असा सवाल त्यांनी केला.