अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कार्यकर्ते सज्ज राहावेत, असे आवाहन रिपाईचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यातील राखीव जागांमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अक्कलकोट तालुक्यातील जकापूर येथे रिपाई शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी पक्ष संघटन मजबूत करून निवडणुकीच्या तयारीला गती देण्याची गरज असल्याचे मडिखांबे यांनी सांगितले. नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने खाते उघडले असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही रिपाईचे खाते उघडण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे त्यांनी आवाहन केले.
जागा वाटपाबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी रिपाईचे शिष्टमंडळ घेऊन लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याचेही मडिखांबे यांनी सांगितले. चर्चेअंती काही जागा रिपाईसाठी सोडवून घेण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आमसिध्द वंटे हे होते. यावेळी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, तालुका युवक अध्यक्ष अप्पा भालेराव, शहर अध्यक्ष अजय मुकणार, राजू भगळे, तम्मा दसाडे, कार्याध्यक्ष अंबादास गायकवाड, उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, माजी सरपंच संतोष आळगी, प्रकाश दुपारगुडे, सचिन बनसोडे, यमनप्पा शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.