ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.पडळकरांनी सोडली पातळी ; अजित पवार संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचे दिसून आले. यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण व्यक्त होताना समाजामध्ये सलोखा राहील, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करु नये. अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे असते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचे एकमेव धोरण आहे. महायुती तीनही पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केले आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे आमचे धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झाले त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!