ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“अजित पवार विमान दुर्घटना: ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; तपासावर राजकीय प्रश्नचिन्ह” !

मुंबई : वृत्तसंस्था

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही साधने दीर्घकाळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांना मोठे नुकसान झाले असून तपास प्रक्रियेस काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास सुरू असल्याचे यंत्रणेने नमूद केले आहे. तर्कवितर्कांना बळी न पडता अधिकृत तपासावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, विमानात दोन स्वतंत्र नोंदणी साधने होती. त्यापैकी एकातील एल-३ प्रणालीशी संबंधित संभाषण व उड्डाण माहिती यशस्वीरित्या प्राप्त करण्यात आली आहे. मात्र कॉकपीटमधील संभाषण नोंदवणाऱ्या उपकरणावर अद्याप सखोल तांत्रिक परीक्षण सुरू आहे. संबंधित उपकरण हे Honeywell कंपनीनिर्मित असल्याने संबंधित देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत मागविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमानवाहतूक निकषांनुसार आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने तपास केला जात असल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

विमान दुर्घटनेनंतर सर्वप्रथम शोधले जाणारे साधन म्हणजे ‘ब्लॅक बॉक्स’. प्रत्यक्षात त्याचा रंग तेजस्वी नारंगी असतो आणि तो दोन भागांमध्ये विभागलेला असतो. एक भाग उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) साठवतो, तर दुसरा भाग कॉकपीटमधील संभाषण (कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर) नोंदवतो. अत्यंत उच्च तापमान, पाण्याचा दाब आणि धक्के सहन करण्यासाठी त्याची विशेष रचना केलेली असते. बॅटरी सुमारे तीस दिवस कार्यरत राहते आणि त्यातील माहिती दीर्घकाळ सुरक्षित राहू शकते. त्यामुळे कोणत्याही विमान दुर्घटनेत हे साधन निर्णायक मानले जाते. दुर्घटनेनंतर विशेष प्रशिक्षण घेतलेली पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान दुर्घटना तपास यंत्रणा यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ संस्था व आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहाय्य घेण्यात येत आहे. नुकसानग्रस्त नोंदणी साधनांमधून शक्य तितकी माहिती पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, रोहित पवार यांनी तपासाच्या गतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुर्घटनेला वीस दिवस उलटूनही तपासाला अपेक्षित वेग मिळालेला नाही, अशी टीका त्यांनी केली. काही पुरावे नष्ट करण्यासाठी विलंब तर केला जात नाही ना, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. संबंधित कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे का, हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. ब्लॅक बॉक्स नुकसानग्रस्त असल्याची माहिती समोर आल्यानंतर आपल्या शंकेला बळ मिळाल्याचा दावा करत, “ही दुर्घटना की घात, याचे उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे तपास प्रक्रियेवर राजकीय दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!