अक्कलकोट मतदारसंघातील रस्त्यासाठी नितीन गडकरी यांच्याकडून १२ कोटी रुपये मंजूर,आमदार कल्याणशेट्टी यांची माहिती
अक्कलकोट,दि.२२: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील धोत्री ते काझीकणबस या प्रमुख जिल्हा मार्गासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मार्ग निधीतून १२ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.अक्कलकोट तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण रस्ते खराब असल्याची तक्रार नागरिकांकडून सतत होत होती. कल्याणशेट्टी यांनी आमदार म्हणून निवडून येताच संबंधित विभागामार्फत या वेगवेळ्या रस्त्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर सतत पाठपुरावा करीत आहेत.यापूर्वी अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या अनेक राष्ट्रीय ,राज्य व जिल्हा
मार्ग यांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे.आता सदर मंजूर निधीतून धोत्री ते हन्नूर ,चुंगी,किणी मार्गे काजीकणबस हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४३ याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.यामुळे या भागातील नागरिकांना आता सोलापूर येथे कमी अंतराच्या प्रवासाने जाणे अधिक सुखकर होणार आहे.यापूर्वी अर्थसंकल्प व अतिवृष्टी दुरुस्ती निधीतून बऱ्हाणपूर ते बोरगाव,अरळी ते नन्हेगाव,सुलतानपूर ते किणी,किणी ते पालापुर,देशमुख बोरगाव मार्गे वागदरी तसेच किणीमोड ते घोळसगाव व प्रामुख्याने तडवळ भागातील स्त्यांसाठी सुद्धा मोठया प्रमाणावर निधी मिळाल्याने प्रश्न मार्गी लागले आहेत.तसेच अक्कलकोट तालुक्यातील गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून दुर्लक्षित असलेला अक्कलकोट मार्गे नागणसुर,
तोळणूर बोरोटी सीमा हा रस्ता पार करण्यास दोन तास वेळ लागायचा पण आता प्रवासी हा मार्ग ३० ते ३५ मिनीटात पार करीत आहेत याचबरोबर तिलाठी गेट ते वळसंग मार्गे मुस्ती तसेच वागदरी ते मराठवाडा सीमा हे रस्ते पूर्ण होत आल्याने या मार्गावरील प्रवासी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.नितीन गडकरी यांच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील सर्वच भागातील वेगवेगळ्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे.आता येत्या काळात उर्वरित ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते पूर्ण होऊन नागरिकांना व्यापक दळणवळण सुविधा मिळवून द्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील रस्ते
चांगले करणार
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकाससाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असल्याने तालुक्याचा चारही बाजूने होत असलेले रस्ते ही परिसरातील नागरिकांना व शेतकरी बांधवाना चांगली दळणवळण सुविधा निर्माण होणे, तिर्थक्षेत्राचे विकास होणे व भाविकांची रेलचेल वाढणे यासाठी मदतीचे ठरणार आहे.येत्या काळात उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी आणखी निधी मिळवून ते काम पूर्ण करण्याकडे माझे लक्ष आहे.
सचिन कल्याणशेट्टी,आमदार