ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अमरनाथ यात्रा ‘या’ कारणाने पुन्हा थांबवली !

श्रीनगर | वृत्तसंस्था

जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 30 जुलैपासून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरील यात्रा थांबवली आहे.

जम्मू-काश्मीर माहिती आणि जनसंपर्क विभागाने (DIPR) आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वी ट्विटर) हँडलवरून याबाबत घोषणा केली आहे. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी स्पष्ट केले की, 31 जुलै रोजी भगवतीनगर, जम्मू येथून कोणताही भाविक काफिला बालटाल किंवा नुनवान आधार छावण्यांकडे रवाना केला जाणार नाही.

काश्मीर विभागाचे आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी देखील सांगितले की, 30 जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे बालटाल आणि चंदनवाडी मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि ट्रॅक स्लिप होण्याचा धोका वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू झाली असून ती 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिवशी संपणार आहे. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. याआधी 17 जुलैलाही खराब हवामानामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.

प्रशासनाकडून भाविकांना सतर्कतेचे आणि सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान सुधारल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रशासन व DIPR तर्फे देण्यात आली आहे. अमरनाथ गुहा ही समुद्रसपाटीपासून 3,888 मीटर उंचीवर दक्षिण काश्मीरमध्ये आहे. यात्रेसाठी पारंपरिक 48 किमीचा पाहलगाम मार्ग आणि छोटा पण कठीण 14 किमीचा बालटाल मार्ग वापरला जातो. 27 जुलै रोजी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेला झेंडा दाखवून औपचारिक सुरुवात केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!