मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर मंत्रीपदाची माळ भुजबळ यांच्या गळ्यात पडली आहे. धनंजय मुंडेंकडील खातं अर्थात अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळांना दिले जाणार आहे. सध्या हे खातं स्वत: उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी ट्वीट करत अनेक सवाल उपस्थित करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून एक्स अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “वाह फडणवीस वाह, म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात?” असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे.
“आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, अशी टीकाही अंजली दमानियांनी केली आहे.
“या घोषणा आठवतात?”
“भ्रष्टाचारीयों पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार’, ‘भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम’, हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.