मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार या निकाल बाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कार्यपद्धती जाहीर केली आहे.
दहावीचा निकाल कशा पद्धतीने जाहीर होणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार निकालाबाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
दहावीचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे होणार आहेत. निकाल संदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शाळांच्या मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. वेळापत्रकाची अंमलबजावणी झाल्यास दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल पारदर्शक होण्यासाठी शाळांमध्ये 7 सदस्यीय निकाल समिती स्थापन केली जाणार आहे.
दहावीचा निकाल संदर्भातील कार्यपद्धतीमध्ये नववीचा अंतिम निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामध्ये 100 गुणांचे 50 गुण तयार करण्यात येणार आहेत. तर दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषय निहाय गुणदान करण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता नववीतील शंभर पैकी 50 गुण तर दहावीतील 80 पैकी तीस गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत.