मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चेचं शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी खंडण केलं आहे. विधानभवनात दोन आमदार मोठ्या आवाजात बोलले, तर त्याला एकमेकांना भिडणे असं म्हटलं जात नाही. असा कोणताही वाद विधानभवनात झाला नाही, असं देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेचा भडीमार करीत आहेत. अधिवेशनाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विधानभवनात राज्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत भरत गोगावले आणि इतर आमदार देखील होते. मुख्यमंत्री शिंदे सभागृहात आल्यानंतर विकासकामांबाबत चर्चा करताना शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केली.
दरम्यान, शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये विधानभवनातच वाद झाल्याची बातमी राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली. काही माध्यमांनी तर दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं वृत्त दिलं. हे वृत्त समोर येताच शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई तातडीने विधानभवनाच्या बाहेर आले. नेमकं विधानभवनात काय घडलं? याबाबत त्यांनी माध्यमांना उलगडून सांगितलं.