अॅडलेड, AUS vs IND 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पार पडला. भारतीय संघ अपेक्षित धावसंख्या उभारू शकला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचे पारडे भारतापेक्षा वरचढ असल्याचे पाहायला मिळाले.
कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली आहे. वृद्धिमान साहा (९) आणि आर. अश्विन (१५) नाबाद आहेत. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (४३) आणि अजिंक्य रहाणे (४२) यांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दुसरा सलामीवीर मयांक अगरवालला यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयश आले, त्याला १७ धावा करता आल्या. त्यानंतर अनुभवी पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. मात्र, नॅथन लॉयन यानं पुजाराला बाद करत जोडी फोडली. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली.