नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत मानधन देण्यात येते. हे अनुदान आता त्याच महिन्यात थेट पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच देण्यात येईल, अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. प्रसाद लाड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थीच्या अर्थसाहाय्यात दरमहा एक हजार रुपयावरुन पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे. हे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल. तसेच आर्थिक निकषांची मर्यादा वाढविण्यात येईल. दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील. त्याचप्रमाणे महिला सुधारगृहातील मुलींच्या वयाची मर्यादा २५ वर्षे किंवा लग्नापर्यंत वाढविण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.